पुणे : सायंकाळची वेळ… पुणे तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी… त्यात कामगार वर्गाच्या बस रस्त्याच्या कडेला थांबत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावलेला. त्यातच इच्छित स्थळी पोहोचण्याच्या घाईने दुचाकीस्वारांकडूनही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र. अशा परिस्थितीत लिंब फाटा येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका वाहतूक महिला पोलिस कर्मचाऱ्याने दाखवलेले कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण कौतुकास्पद ठरले.

३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लिंब फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी गर्दीतून वाट काढत पुढे जात वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यास सुरुवात केली.

विशेष बाब म्हणजे, संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा एक हात गळ्यात बांधलेला होता. हाताला दुखापत किंवा फ्रॅक्चर असण्याची शक्यता दिसत असतानाही त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता केवळ एका हाताने वाहनचालकांना थांबवत आणि पुढे जाण्याचे संकेत देत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू ठेवले.

गर्दी, वाहनचालकांची घाई आणि वाढलेला वाहतुकीचा ताण अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी काही मिनिटांतच वाहतूक सुरळीत केली. त्यांची ही कर्तव्यनिष्ठा पाहून उपस्थित नागरिकांकडूनही कौतुक व्यक्त करण्यात आले.

‘कर्तव्य हेच प्रथम’ या भावनेने स्वतःच्या दुखापतीची पर्वा न करता वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेले हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून, वाहतूक पोलिसांच्या कर्तव्याप्रती असलेल्या समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणावे लागेल.
