|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
पिंपरी -चिंचवड : पर्यावरण दिनानिमित्त वाल्हेकरवाडी परिसरात नगरसेविका तथा शिक्षण मंडळ सदस्या सौ. पल्लवीताई सुधीर वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी हॉस्पिटलजवळील स्पाईन रोड परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि झपाट्याने होत असलेले शहरीकरण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाची जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी आपल्या मनोगतात नगरसेविका तथा शिक्षण मंडळ सदस्या सौ. पल्लवीताई सुधीर वाल्हेकर म्हणाल्या, “वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. आज आपण ज्या वेगाने पर्यावरणीय संकटांना सामोरे जात आहोत, त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास आपल्या शहराचा हरित विकास निश्चितपणे साध्य होऊ शकतो. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे. आज लावलेले प्रत्येक रोपटे उद्याच्या पिढीसाठी निरोगी जीवनाचा आधार ठरणार आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. हरित पिंपरी-चिंचवडच्या निर्मितीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.”

यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले माजी नगरसेवक तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. नामदेवजी ढाके यांनी पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शहराचा वाढता विस्तार आणि कमी होत चाललेली हरितक्षेत्रे ही चिंतेची बाब आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही. नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक प्रभावी होऊ शकते. आजचा उपक्रम हा केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”

या उपक्रमास माजी नगरसेवक मा. राजेंद्र साळुंखे, विद्यमान नगरसेविका मा. आशाताई सूर्यवंशी, माजी शिक्षण सभापती मा. श्रीधरभाऊ वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते मा. विलास वाल्हेकर, युवा मंडलाध्यक्ष मा. यश वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते मा. सचिन वाल्हेकर, सौ. रूपालीताई वाल्हेकर, सौ. कीर्ती परदेशी यांच्यासह नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
