फुगेवाडी : फुगेवाडी येथे विषारी दारू प्राशनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देत माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या वतीने एक महिन्याच्या शिधा किटचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिधा वाटप कार्यक्रमात श्री. गुल्लू शेठ आसवानी, माजी नगरसेवक माऊली थोरात, विशाल वाळुंजकर, मंगेश घाडगे, महेंद्र बाविस्कर, भाजपा मंडलाध्यक्षा अनिता वाळुंजकर , श्री यशवंत भोसले , डॉक्टर वाबळे , यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या विषारी दारू दुर्घटनेचा मुख्य आरोपी मंगलसिंग वीरका असल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्या घरातून झालेल्या दारू वितरणामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्याच्या अनधिकृत बांधकामास नोटीस बजावलेली असून, सदर ठिकाणी भेट देत अमर साबळे यांनी १७ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या अनधिकृत घरावर तात्काळ बुलडोजर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.

“निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी व्यक्तीवर कायमस्वरूपी दहशत निर्माण व्हावी, यासाठी त्याच्या अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन अमर साबळे यांनी केले.

दरम्यान, विषारी दारू प्राशनामुळे अत्यवस्थ झालेल्या व वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही अमर साबळे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांची माहिती घेतली व रुग्णांना आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगरसेवक माऊली थोरात, विशाल वाळुंजकर, गोपीशेठ आसवानी, नंदकुमार वाखारे, मंगेश धाडगे, अनिता वाळुंजकर, महेंद्र बाविस्कार, दिपक नागरगोजे, विशाल सातपुते, सुभाष सिंघल, सुर्यकांत वाखारे, रामदास भांडे, राजेश निहूल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पीडित कुटुंबीयांना मदत व आवश्यक समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे लवकरच विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नागरिकांच्या भावना
फुगेवाडीतील या दुर्दैवी दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावले गेले आहेत. घरातील कर्ती व्यक्ती गमावल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची व आर्थिक संकटाची वेळ आली आहे. अशा कठीण प्रसंगी अमर साबळे यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मदतीचा हात दिल्याने कुटुंबीयांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “आमचे माणूस गेले, ती पोकळी कधीच भरून निघणार नाही; मात्र या दुःखाच्या काळात आमच्या दारी येऊन आधार दिल्याने आम्हाला मानसिक बळ मिळाले,” अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.
