मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणाने राज्याच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

शपथविधीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार म्हणाल्या की, हा क्षण अत्यंत भावनिक असून मोठी जबाबदारी स्वीकारताना आदरणीय अजितदादांची आठवण सतत सोबत आहे. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक तसेच समाजातील वंचित घटकांसाठी दिलेला संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुखतेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे सावट असले, तरी त्यांच्या विचारांची ऊर्जा आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हेच आपले सर्वात मोठे बळ असल्याचे नमूद करत, शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे सांगत जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच आपला संकल्प असल्याचे सुनेत्रा अजितदादा पवार यांनी यावेळी नमूद केले
