मुंबई : पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन २०१७ मधील अत्यंत गंभीर आणि मन हेलावून टाकणाऱ्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सत्र न्यायालय, मुंबई (कोर्ट क्र. ५४) येथील सत्र न्यायाधीश महेश के. जाधव यांनी सेशन केस क्र. ७९/२०१८ मध्ये हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी नितीन कारभारी पठारे याने फिर्यादी अफसाना अमजद कुरेशी (वय ३४) व त्यांच्या मुलांना घरातच कैद करून ठेवत सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच किरकोळ कारणांवरून त्यांच्यावर वारंवार मारहाण केली जात होती. दिनांक २८ सप्टेंबर २०१७ रोजी फिर्यादीचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा आहील याच्या हातून कप फुटल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात त्याचा गळा दाबून निर्घृणपणे खून केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

गुन्हा केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चिमुकल्याचा मृतदेह कल्याणजवळील हाजी मलंगगड परिसरात खड्डा खणून पुरला. इतकेच नव्हे तर फिर्यादीची मुलगी तमन्ना हिला धमकावून हा प्रकार लपवण्याचाही प्रयत्न केला.
मात्र आईने दाखवलेल्या धैर्यामुळे हे भीषण सत्य समोर आले. फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी अत्यंत बारकाईने, शिस्तबद्ध आणि पुराव्यांवर आधारित तपास करत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले. गुन्ह्याची संपूर्ण साखळी उलगडून न्यायालयासमोर भक्कम मांडणी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ₹२५,००० दंड, कलम २०१ अंतर्गत ५ वर्षे कठोर कारावास व ₹१०,००० दंड, तसेच कलम ३२३ अंतर्गत १ वर्ष साधी कैद व ₹१,००० दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील रमेश सिरोया यांनी प्रभावी युक्तिवाद करत न्यायालयासमोर मजबूत बाजू मांडली. तसेच तपास प्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक अमिता चव्हाण यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या अचूक, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक तपासामुळेच आरोपीला कठोर शिक्षा मिळाली, अशी प्रतिक्रिया न्यायालयीन वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.