पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाकड येथील युवा उद्योजक तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुषार भूमकर हे फॉर्च्युनर कारमधून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास बोगद्यात त्यांच्या कारने पुढे असलेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बोगद्यातील दोन लेनवर काही वाहने उभी असल्याने वाहतुकीच्या परिस्थितीमुळे वेगातील कारचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

तुषार भूमकर यांच्या आकस्मिक निधनाची बातमी वाकड परिसरात पोहोचताच शोककळा पसरली. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढवली होती.
या अपघातामुळे मिसिंग लिंक बोगद्यातील वाहतूक व्यवस्थापन, लेनवरील वाहनांची सुरक्षितता आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
