ठाणे : जन्मदात्या आईने आपल्या तीन मुलींसह जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील फेणे गावच्या हद्दीत घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेतल्याचे समोर आले आहे. सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.
अधिक माहितीनुसार, फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (व-३२) व मुली नंदिनी (व-१२),नेहा (वय -७) व अनु (वय -४) यांसोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेकदा दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याला धक्काच बसला.
दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगल वर गळफास घेतलेले मृतदेह आढळून आले. घटनास्थळी आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेली चिट्ठी मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
