बीड : रविवारी मध्यरात्री अडीच वाजता बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीत मोठा स्फोट घडला आहे. मध्यरात्री अशाप्रकारे स्फोट घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पण हा स्फोट घडल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासांत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
दोन्ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे गावात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
मात्र पोलिसांच्या तत्परतेमागं एक सरपंच असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित सरपंचामुळेच पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावणं शक्य झालं. कारण ज्यावेळी हा स्फोट घडला, त्यावेळी अर्धमसला गावच्या माजी सरपंचांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय त्यांनी पुढच्या २० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यांना गावातील इंत्थभूत माहिती असल्याने पोलिसांना घटनेचा तपास करणं सोपं गेलं आणि अवघ्या तीन ते चार तासांत संशयितांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे, याबाबतची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी स्वत: दिली.
नवनीत कांवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मशिदीत जिलेटिन कांड्यांचा वापर करून हा स्फोट घडवला आहे. हा स्फोट घडल्यानंतर अर्धमसला गावच्या सरपंचांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि ते अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.सरपंचाच्या सहकार्यामुळे आम्ही दोन्ही आरोपींना सकाळी सहा वाजता अटक केली. सर्वांनी शांततेत राहावे असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी सांगितलं की, मशीद स्फोट प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहेत. गावामध्ये शांतता आहे. बीड जिल्ह्यातील सर्व लोकांना आव्हान आहे की शांतता राखावी. झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलीस तत्पर आहे. लगेच पोलिसांनी येऊन दोन-तीन तासांमध्ये आरोपींना पकडले आहे. आम्ही आमच्या शंभर टक्के काम केले आहे. लोकांनी शांततेत राहावे. दोन्ही सण शांततेत सादरी करावेत, असं आवाहन कांवत यांनी केलं आहे.
स्फोट का घडवला ?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूस मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादातून हा स्फोट घडवल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी स्फोट घडवला, तेव्हा आरोपी दारूच्या नशेत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. गाव शांत आहे. घटनेनंतर मशीद स्वच्छ केली आहे. गावातील सगळे लोक एकत्रित राहत आहोत. कुठलाही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गावातील मुस्लिम बांधवांनी केलं आहे.
